पर्यटन , पर्यावरणाने समृद्ध शिवजन्मभूमी जुन्नर तालुका ....
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सुवर्णारंभ शिवजन्माच्या रूपाने जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला, बाल शिवबांची सोनपावले सर्वप्रथम ज्या भूमीवर बागडली, तान्हुल्या शिवबांचे तेजस्वी रूप ज्या आसमंताने न्याहाळले, बालशिवबांसाठी राजमाता जिजाऊंनी गायलेल्या अंगाईगीताच्या शब्दफुलांचे सुर जिथे दरवळले, महालाच्या गवाक्षातुन बालशिवबांना राजमाता जिजाऊंनी स्वातंत्र्यसुर्य दाखवला, त्या शिवनेरीवरील शिवजन्मस्थळाची वास्तू म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण, चैतन्यस्थळ होय. याच किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहर वसलेले असून कि जे ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच आजचे जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शक राजाची त्यावेळी नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
आज पुणे व ठाणे जिल्ह्यातील कोकणकडा स्थित असलेला त्यावेळी ऐतिहासिक नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग होता. याच मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात बैलगाडी, गाढवाच्या अंगावर माल लादुन वाहतूक चालत असे. सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर नजर ठेवण्यासाठी किल्ले जीवधन, निमगिरी, हडसर,चावंड , शिवनेरी, लेण्याद्री डोंगर, तुळजाभवानी डोंगर, मानमोडी डोंगर परीसरातील किल्ले व लेणींचा वापर केला जात असे. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक दानधर्म करत विविध ठिकाणी लेणी खोदवून घेतल्या. सातवाहनांनंतर आजचा किल्ले शिवनेरी हा चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथेच आपले राज्य स्थापन केले व याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना जुन्नरला झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीराजेंनी त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीगडावर नेले. ‘शिवनेरी गडावर श्री भवानी शिवाईस जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझेच नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर श्री.छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये माता जिजाबाईने आणि श्री .छत्रपति शिवाजी महाराज यांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न श्री. छत्रपति शिवाजी महाराजांनी केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. एवढा मोठा प्रगल्भ ऐतिहासिक, नैसर्गिक, भौगोलिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या जुन्नर तालुक्याला दि. ९ जानेवारी २०१८ महाराष्ट्र शासनाने पर्यटन तालुका म्हणून प्रथम मान दिला.
जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नैसर्गिक भौगोलिक व सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी हजारो पर्यटक हे प्रत्यक्ष अनुभवायला व पहायला येऊ लागले व निसर्ग सौंदर्याने नटलेले सात किल्ले
१) किल्ले शिवनेरी- (जुन्नर )
२) किल्ले नारायणगड - (खोडद)
३) किल्ले चावंड ( चावंड गाव)
४) किल्ले जिवधन ( घाटघर )
५) किल्ले निमगिरी (निमगिरी गाव)
६) किल्ले हडसर (हडसर गाव)
७) किल्ले सिंदोळा (मढ, पारगाव )
व या व्यतिरिक्त आपणास नारायणगाव, ओतुर व सध्या जुन्नर शहरात कचेरी असलेल्या ठिकाणच्या भुईकोट किल्ले असलेल्या अवशेषांचा पण पुढे अभ्यास करू लागले.
महाराष्ट्र राज्यात १ हजार पैकी ३५० च्या आसपास लेणी जुन्नर तालुक्यात आढळून येत असल्याने भारतात जुन्नर तालुका हा सर्वात जास्त लेणी असलेला एकमेव तालुका म्हणून ओळखला जातो या लेण्या आपण पुढील भागात पाहू शकतो.
१) अंबा अंबिका लेणी (खोरे वस्ती जुन्नर )
२) शिवनेरी किल्ला लेणी (जुन्नर )
३) तुळजाभवानी लेणी (पाडळी)
४) लेण्याद्री विनायक लेणी(लेण्याद्री )
५) बल्लाळ वाडी गट लेणी (लेण्याद्री )
६) चावंड लेणी (चावंड गाव)
७) हडसर लेणी (हडसर गाव)
८) निमगिरी लेणी (निमगिरी गाव)
९) प्रसिद्ध नाणेघाट लेणी (घाटघर)
१०)खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर )
११)जीवधन लेणी समुह (घाटघर)
जुन्नर तालुक्याला विविध प्रकारच्या ऐतिहासिक मंदिरांचा पण वारसा लाभला आहे पैकी दोन अष्टविनायक मंदिरे जुन्नर तालुक्यात आढळून येतात व शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.
तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरे:-
१) अष्टविनायक मंदिरे:-
i) गिरीजात्मक - लेण्याद्री
ii) विघ्नेश्वर - ओझर
२) हेमाडपंथी बांधणीतील कोरीव पुरातन मंदिरे :-
i) नागेश्वर मंदिर - खिरेश्वर
ii) कुकडेश्वर मंदिर - कुकडेश्वर
iii) अर्ध पीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर - पारूंडे
३) संत समाधी मंदिर :-
i) संत ज्ञानेश्वर वेद प्रणित रेडा समाधी- आळे
ii) संत रंगदास स्वामी समाधी - आणे
iii)चैतन्य महाराज समाधी - ओतुर
iv)संत मनाजीबाबा पवार. - निमगावसावा
४) इतर पेशवेकालीन महत्वाची मंदिरे:-
i) पंचलींग मंदिर - जुन्नर
ii) पाताळेश्वर मंदिर - जुन्नर
iii) उत्तरेश्वर मंदिर - जुन्नर
iv) खंडोबा मंदिर (कुलदैवत) - वडज
v) रेणुका माता मंदिर -निमदरी
vi)गुप्त विठोबा प्रति पंढरपूर मंदिर, - बांगरवाडी
viii) वरसुबाई माता मंदिर - सुकाळवेढे
ix) दुर्गादेवी मंदिर - दुर्गवाडी
x) कपर्दिकेश्वर मंदिर - ओतुर
xi) जगदंबा माता मंदिर - खोडद
xii) मारूती मंदिर. . - निरगुडे
xiii)खंडोबा मंदिर(कुलदैवत) - धामणखेल
xiv) महालक्ष्मी मंदिर. - उंब्रज
xv). पिपळेश्वर मंदिर. - पिंपळवंडी
xvi- हटकेश्वर मंदिर. - गोद्रे
जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध देवराया-
१) अंजनावळ्याची भैरवनाथाची देवराई
२) दुर्गवाडीची दुर्गादेवी देवराई
३) तळेरानची काळुबाईची देवराई
४) ढाकोबा देवराई
प्रसिध्द निसर्ग रम्य घाट :-
i) पुरातन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट - घाटघर
ii) माळशेज घाट - कल्याण - मुंबई महामार्ग
iii)दार्याघाट - आंबोली
iv) आणेघाट - आणे
v) लागाचा घाट
vi) म्हसवंडी घाट
vii)इंगळुन घाट
viii)हिवरे मिन्हेर घाट
प्रसिद्ध धबधबे :-
i) आंबोली
ii) नाणेघाट
iii)माळशेज
iv)इंगळुन
v) हातवीज
vi)दुर्गादेवी
प्रसिद्ध नद्या.
i) मीना नदी व उगमस्थान आंबोली
ii) कुकडी नदी व उगमस्थान कुकडेश्वर
iii) पुष्पावती नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
iv) काळू नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
v) मांडवी नदी व उगमस्थान फोपसंडी अ.नगर
प्रसिद्ध धरणे:-
i) येडगाव धरण - कुकडी नदी
ii)वडज धरण - मीना नदी
iii)माणिकडोह धरण - कुकडी नदी
iii)पिंपळगाव जोगा धरण - पुष्पावती नदी
iv)चिल्हेवाडी धरण - मांडवी नदी
प्रसिद्ध बारवा (विहीरीत) :-
i) बाराबावडी - जुन्नर
ii) कुंदलबावडी - जुन्नर
iii) आमडेकर विहीर - पाडळी
iv) भोरवाडीची बारव - भोरवाडी
v) कुतळमळा बारव - कुतळमळा
vi) गणेशनगर बारव - येडगाव
vii) चौदानंबर बारव. - चौदानंबर
प्रसिध्द खिंडी
i) गणेश खिंड
ii)मढ खिंड
iii)टोलार खिंड
iv)आळे खिंड
ऐतिहासिक वास्तू :-
i) सौदागर हाबसी घुमट - हापुसबाग
ii) 300 वर्षे जूना मलिकांबर बाराबावडी
पाणीपुरवठा योजना जुन्नर शहर.
iii) नवाब गढी - बेल्हे
iv) गिप्सन निवास व समाधी.
जुन्नर येथील दगड वाजतात घंटे सारखे. हे एक खुप मोठे आश्चर्य आहे. हे दगड आंबे या गावच्या पश्चिमेस अगदी 200 मी. अंतरावर आहेत. व बाकिचे दगड दुर्गादेवी किल्ले टाॅपवर आहेत.
जागतीक केंद्र :-
i) जागतिक महादुर्बिण - खोडद
ii) विक्रम दळणवळण उपग्रह - आर्वी
पठार :-
i) आंबे हातवीज पठार
ii) नळावणे पठार
iii) कोपरा मांडवे पठार
त) गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फुट खोल असलेले कोकणकडे पहायला मिळतात कि जे गिर्यारोहणासाठी खुप महत्वपूर्ण आहे.
i) नाणेघाट
ii) माळशेज
iii)दार्याघाट
iv)ढाकोबा
v) दुर्गादेवी
प्रसिध्द रांजण खाचखळगे:-
i) माणिकडोह गावातील कुकडी नदीत
दहा लाख अधिक वर्षापुर्वी भुकंप झालेल्या उद्रेकाची राख आजही पहावयास मिळते. याचे संदर्भ प्र. के. घाणेकर सर व डेक्कन काॅलेज रिपोर्टमध्ये वाचावयास मिळतो. - बोरी गाव
प्रसिद्ध कारखाने :-
i) कागद कारखाने - जुन्नर
ii) विघ्नहर सहकारी साखर कारखाना - ओझर
iii) इतर अनेक नवनिर्मित कारखाने
तमाशा पंढरी - नारायणगाव
या मंचाच्या माध्यमातून अनेक लोक कलाकारांचा जन्म जुन्नर तालुक्यात रसिकांच्या गोडीतुन झाला व पाहाता पाहता देशात तमाशा केंद्र म्हणून नारायणगाव शहराला मान मिळाला. येथे अनेक तमाशा कलाकार स्व कलाकृतीद्वारे समाजासमोर आले. व त्यातुन अनेक नवनवीन तमाशा फड उभे राहिले. व राष्ट्रपती पारीतोषीक विजेते ठरले.
बिबटय़ा निवारण केंद्र - माणिकडोह(जुन्नर ) येथे उभारण्यात आले.
खाद्य संस्कृती :-
i) आण्याची आमटी
ii) जुन्नरची मासवडी ,लसूण चटणी, मटण /
चिकन भाकरी , मटकी भेळ
iii) राजुरी चा किसनदादा पेढा
iv) जुन्नरचा खत्री पेढा
v) जुन्नरची मिसळ
नैसर्गिक नेढी ( पुल)
i) आणे घाटातील नैसर्गिक पुल
ii) हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पुल.
iii) खिरेश्वरचे पिस्तुल नेढे
iv) दात नेढे घाटघर
v). घाटघरचे कोकणकडा नेढे
आठवडे बाजार
आजही 350 वर्ष परंपरेचा इतिहास असलेला आठवडे बाजार सोमवारी बेल्हे गावचा पहावयास मिळतो. खरेदी विक्री साठी हजारो व्यापारी आणि ग्राहक येथे यात्रेच्या स्वरूपात पहावयास मिळतात. या दिवशी शाळेस सुट्टी असते व रविवारी शाळा भरते. येथील सर्वात प्रसिद्ध मानला जातो तो बैल बाजार या बाजारात प्रत्येक सोमवारी दोन ते अडीच हजार बैलांचा खरेदी विक्रीचा एकाच दिवशी व्यापार चालतो.
जुन्नर तालुक्यातील भुयारे दिसणारी ठिकाणे.
१) जुन्नर शहरात पंचलिंग मंदिराजवळ
२) हटकेश्वर डोंगर माथ्यावर
३) किल्ले चावंडवर
४) किल्ले हडसर
५) किल्ले जीवधन वर पाच ठिकाणी.
लिंगी किंवा सुळके
१) घाटघर येथील वानरलिंगी ३५० फुट
२) फांगुळगव्हाण येथील लिंगी ६० फुट
व-हाडी डोंगर
१) गोद्रे येथील व-हाडी डोंगर अर्थात हटकेश्वर
२) अंजनावळे येथील व-हाडी डोंगर
विविध कृषी पर्यटन केंद्रे अशा विविधतेने जुन्नर तालुका नटलेला पहावयास मिळतो आहे. पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या काळात जुन्नर तालुका गरूडझेप घेत असुन पर्यटकांची मांदियाळी येथे पहायला मिळत आहे परंतु खरी गरज आहे ती येथे येणाऱ्या पर्यटकांकडून स्थानिकांच्या सहकार्याने शिस्तबद्ध पद्धतीने पर्यटन घडविण्याची. कारण आता पर्यटन जो पर्यंत येथे जैवविविधता जिवंत आहे तोपर्यंत पर्यटनाचा उद्देश साध्य नक्कीच होईल परंतु जैवविविधता लोप पावली तर भविष्यात हाच सफल उद्देश शाप ठरेल. या लेखाच्या माध्यमातून एकच सांगू शकेल की पर्यटनाबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि जतन करण्यासाठी पण आपण चळवळ उभी करत पर्यावरण देवतेला पण आपण प्रसन्न ठेवण्याचा निश्चितच प्रयत्न करत योगदान देवू.
लेखक -: श्री रमेश गणपत खरमाळे, (माजी सैनिक )
पर्यावरण प्रेमी
Comments
Post a Comment